२६ डिसेंबर, २००९

एका जंगलाची गोष्ट

खूप पुर्वीची गोष्ट नाही. असेल काही वर्षांपूर्वीचीच. पण वाटते कित्येक युगे लोटली असतील त्याला. तर मी काय म्हणत होतो, पूर्वी एक होते जंगल. आता तुम्ही म्हणाल त्यात काय इतके, पूर्वी होतीच जंगलं खूप. आता माणसाची भूकच इतकी वाढली आहे की जंगलांना जागाच उरलेली नाही वाढायला. एका जंगलाला लागून दुसरे असे वाढत होते, आपल्याच हिशोबाने. जंगलांना काही डेडलाईन नसते की क्लाएंटची भिती. वाढायला लागली काही वर्ष तर कोणाला काय पडलीय त्याची?
तर त्या जंगलाकडे एका कुशल माळ्याचे लक्ष गेले. त्याच्या मनात फार पूर्वीपासून एक सुंदर बगिचा बनवायचे फार होते. त्याने काही विचार केला आणि कामाला लागला. प्रथम त्याने आडवीतिड्वी वाढलेली झाडे छाटून टाकली. सुंदर पायवाटा तयार केल्या. चहू बाजूंनी तटबंदी उभारली. एकच प्रवेशद्वार ठेवले येणार्‍या जाणार्‍यांवर लक्ष ठेवायला. आत आल्यावर कोणाच्याही तोंडून उद्गार निघाले पाहिजेत की वा!!
प्रवेशद्वाराशीच एक नोंदवही ठेवली. त्यात येणार्‍या जाणार्‍यांचे शेरे असत. परदेशात राहिलेल्या काही विदुषी इतक्या खूष झाल्या की म्हणाल्या "अगदी इडन गार्डनची आठवण झाली हो!" माळ्याच्या अंगावर मुठभर मास चढले.
जंगली पशू, पक्ष्यांना जंगल आणि गार्डन यातला फरक लगेच कळतो. त्यांनी हे गार्डन केव्हाच सोडले होते. जे राहिले ते रिंगमास्तरकडे बघून दिवस काढू लागले. हे जंगल होते, आहे आणि राहू द्या असे म्हणणार्‍यांच्या बाबतीत माळीकाका "हे दयाळू ईश्वरा या निर्बुद्धांना क्षमा कर ते काय बोलत आहेत ते त्यांचे त्यांना समजत नाही." अशी प्रार्थना करीत. त्यांच्या मनात कोणाबद्दलही काही आकस नव्हताच.
जंगलांचे नियम वेगळे असतात. त्यात एक जीव प्रसंगी दुसर्‍याला खाऊन जगतो. झाडांना बंधन नसते कसे वाढायचे. गायी गुरांच्या जाण्या येण्याच्या वाटेला पायवाट म्हणायचे झाले. तेथे निसर्ग हाच माळी असतो. तज्ज्ञ माळ्याची गरज असते ती बागेला. माणसाला बाग आणि जंगल दोन्ही हवे असते, आहे. हे जंगल असेच राहू द्या. उन्हाने, दुष्काळाने वाळले तरी बिया असतातच कुठेतरी पडलेल्या. त्या उमलतील पुढच्या काळात. पुढच्या पिढ्यांना कधीच न चाखलेली फळ खायला मिळतील करवंदासारखी. कारण त्यांची पैदास बागेत थो़डीच होते?

या लेखात वर्णन केलेल्या बागेचे मराठी विकिपीडियाशी जर साम्य दिसले तर तो एक निव्वळ योगायोग समजावा.