२५ मे, २०१०

असेही असते तर...

अनेक वेळा चावून चोथा झालेले विषय वारंवार चर्चेत आणून त्याचा आधार घेत सुतावरून स्वर्गात जाण्याचा प्रयत्न इंटर्नेटवर पडीक असलेली मंडळी करीत असतात. यातून काहीवेळा जातीय विखारही फुत्कारून घेतला जातो. उदाहरण द्यायचे तर या चर्चेचे देता येईल.

http://mr.upakram.org/node/2510

"वाल्मीकी रामायणातील स्त्रीजीवन" या विषयाशी फोटोसहित "सिक्स पॅक्स विश्वामित्र" आणि "एट(की टेन) पॅक्ड् भगवान परशुरामाचे पक्के युरोपियन वाटणारे कल्पनाचित्र" कसे काय संबंधित असू शकते? याचा अर्थ एकच आपला प्रतिसाद या विषयाशी संबंधित असो वा नसो आपल्या अन्ननलिकेत सतत घोळणारे गरळ कुठेतरी ओकून टाकले की माणसाला थोडे बरे वाटते. अर्थात इंटरनेटचा वापर अशा कारणांसाठीदेखील मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्याला काही हरकत असू नये.

माझाही खालील प्रतिसाद विषयाशी संबंधित नाही, तर एका प्रतिसादाशी संबंधित आहे - म्हणून मी ब्लॉगवर लिहित आहे.
_____

सहज शक्य असणार्‍या अनेक गोष्टी रामाने केलेल्या नाहीत ही गोष्ट लक्षात घेतली की रामाचे वेगळेपण जाणवायला हरकत नाही.
राज्यावर येण्यासाठी बापाचा, भावाचा काटा काढणार्‍या कथांनी जागतिक इतिहासाची पानेच्या पाने भरून गेलेली असताना सहज शक्य असताना राज्याभिषेकापासून दूर जाणारा राम मला तरी अपवादात्मकच वाटतो.

रावणाचे अंत्यसंस्कार करण्यास बिभिषणाने नकार दिला, तेंव्हा मेल्यावर वैर संपते असा विचार देणारा राम तेंव्हाच्याच नव्हे तर नंतर आलेल्या अनेक राजांपेक्षा वेगळा ठरतो.
मरणान्तानि वैराणि निवृतं नः प्रयोजनम् । कीयतामस्य संस्कारो ममापेष्य यथा तव ॥

लंकेतून परत येताना फक्त सीता आणि एअर लंकेचे एक फ्लाईट इतकेच रामाने आपल्याबरोबर आणले. त्यावेळचे त्याचे उद्गार निदान संस्कृत साहित्यात तरी अमर झाले आहेत.
अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥

राम-सीतेबरोबर इतकी वर्षे वनात राहूनही मी केयूरे, कुंडले ओळखत नाही पण सीतेची पैंजण मात्र ओळखतो असे म्हणणारा लक्ष्मण तर काही वेळा रामापेक्षा मोठा वाटतो.
नाहं जानामि केयुरे नाहं जानामि कुण्डले । नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात् ॥

केवळ रामाचेच नव्हे तर लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सर्व भावंडांचे व त्यांच्या अर्धांगिनींचे चारित्र्य सोळा आणे शुद्ध होते असे बहुतेक ऐतिहासिक संसाधने सांगतात. 'तसला' आरोप रामावर कोणी केल्याचे माझ्यातरी वाचनात नाही. प्रस्थापित विचारांना उडवून लावण्याच्या सध्याच्या फैशनचा हा भाग असे असे समजून या आरोपाकडे दुर्लक्ष करणेच चांगले असे माझे वैयक्तिक मत आहे.

११ मे, २०१०

मराठीचा ट्रॅप

दादर सार्वजनिक वाचनालय येथे संपन्न झालेल्या "मराठी ब्लॉगर्स" संमेलनामुळे मला झालेला फायदा म्हणजे इन्स्क्रिप्ट टंकलेखनाचे महत्त्व (नव्याने) समजले. लीना मेहेंदळे यांनी इंग्रजीतून विचार करण्यास भाग पाडणारे फोनेटिक तंत्र विसरा व इन्स्क्रिप्ट पद्धतीने टंकलेखन करा नाहीतर अजून काही वर्षांनी मराठी देवनागरीत का लिहावी? सरळ रोमनागरीतच का लिहू नये असा विचार पुढे येईल आणि तो मान्य झाला तर देवनागरी लिपीच (मराठीपुरती) नष्ट होईल असा इशारा दिला. हा विचार मला थोडा अतिरंजित वाटला. असे होण्याची शक्यता फार कमी आहे. ताईंनी "ट्रॅप" हा शब्द वापरला. मी माझी ओळख करून देताना तोच धागा पुढे नेऊन असे सांगितले की देवनागरी लिपी नष्ट करण्याचा खरा ट्रॅप अशुद्धलेखन व त्याचे निर्लज्ज समर्थन हे आहे. उदाहरण द्यायचे झाले तर "पितळी तांब्या" हा शब्द आपण जर "पितळि पीतळी पीतळि पितली पितलि पीतली पीतलि पित्ळी" अशा विविध प्रकारांनी लिहू लागलो तर अजून काही वर्षांनी रोमन मध्ये लिहिलेले "pitalee tambya" डोळ्यांना अधिक सुखावह वाटू लागेल. त्यात र्‍ह्स्व दीर्घ, जोडाक्षरांची "भानगड" नाही आणि जगात कोणालाही वाचता येईल, भाषा नाही समजली तरी!
विनोबांनी एके ठिकाणी म्हटले आहे की "विस्मरण हा दोष आहे असे कोणाला वाटतच नाही." त्याप्रमाणे अशुद्धलेखन हा एक दोष आहे असे हल्ली कोणाला वाटतच नाही की काय असा प्रश्न मला काही वेळा पडतो. "त्यांच्या"त असेच लिहितात ते मान्य करा नाहीतर मार खाल असे काही बाष्कळ समर्थन कोणी करेल असे वाटत नाही. कवितेत, लिखाणात पात्रांच्या तोंडी जी बोली भाषा यावी लागते ती तशी लिहिण्यास शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे सूट आहेच. आक्षेप आहे तो भाषा आणि लिपी गांभीर्याने न घेण्यावर. ताई आणि दादांनो, माझ्यामते हा ट्रॅप जास्त धोकादायक आहे!!