०५ ऑक्टोबर, २०१०

फोनेटिक लेआउटमध्ये काही बदल

गमभन व बहुधा बरहामध्ये फोनेटिक पद्धतीने शिवाजी हा शब्द दोन पद्धतीने लिहिता आला.
shivAjI
shivaajee

आता हा शब्द सरळ शिफ्ट न वापरता लिहिता आला नसता का?
shivaji

तो तसा लिहिता येत नाही याचे कारण आहे, स्वरांसाठी काही चाव्या राखून ठेवाव्या लागल्या आहेत. उदा.
"e" ही चावी दिली आहे ए साठी (े) पण ही चावी देता आली असती ऱ्हस्व 'इ' साठी
आणि "i" ही चावी देता आली असती दीर्घ 'ई' साठी.
'a' ही चावी देता आली असती दीर्घ आ साठी "ा".
हे बदल केले तर मला shevaji हा शिफ्ट की न वापरता लिहिता येईल आणि त्यामुळे टंकलेखनाचा वेग वाढेल.

आता अशी चाव्यांची अदलाबदल केली तर सध्या त्या चाव्यांवर असणारी अक्षरे टंकण्यास अधिक वेळ नाही का लागणार? सध्या "a e i" वर "अ ए इ" ही तीन अक्षरे आहेत. तर कॅपिटल "A E I" वर आहेत "आ अ‍ॅ ई". पण ही अक्षरे स्वर म्हणून अधिक वापरली जातात. मुळाक्षरे म्हणून नव्हे. "आ" हे अक्षर "ा" या स्वराच्या फक्त तीन टक्के वापरले जाते. आणि हे गुणोत्तर इतर स्वरांच्या बाबतीतही लागू पडते.
थोडक्यात 'शिवाजी' शब्दातील 'वा' या अक्षरात आलेल्या स्वराचे म्हणजे "ा" चे प्रमाण "आकार" या शब्दात आलेल्या "आ" च्या तुलनेत कितीतरी अधिक आहे.

http://spreadsheets.google.com/pub?key=tBJjzbcQB5i7tmfdO5Hk2DQ&output=html

प्रशांत कुलकर्णी यांनी पूर्ण नवीन लेआउट सुचविला आहे. सध्या "s h sh" वर "स ह श" ही अक्षरे येतात. याचा अर्थ श साठी दोन चाव्या वापरल्या आहेत. त्यांनी प्रत्येक अक्षरासाठी एकच चावी वापरावी लागेल अशी योजना केली आहे.

http://prashantkulkarni.blogspot.com/2010/06/blog-post.html

पण की-बोर्डवर केवळ ३३ चाव्या उपलब्ध आहेत. यावर उपाय म्हणून त्यांनी १ ते ९ अंकांच्या चाव्या देखील वापरल्या आहेत. हा उपाय म्हणजे "रोग चालेल पण डॉक्टर आवर" असे वाटेल. कारण अंकांच्या चाव्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हात कीबोर्डवरून पूर्ण उचलावा लागतो आणि पुढची अक्षरे चुकतात.

सध्याच्या गमभन/ बरहातील फोनेटिक स्वरूपातच काही बदल केल्यास टंकलेखनाचा वेग वाढेल असे मला वाटते. पण पूर्ण नवीन लेआउट सध्याच्या घडीला अनावश्यक असून त्यामुळे आहे त्या अराजकतेमध्ये भर पडेल.

१३ ऑगस्ट, २०१०

जटिल प्रश्न

एका डॉक्टरनेच हा प्रश्न विचारला आहे की, गर्भ नाकारण्याचा स्त्रीचा हक्क जसा समाजाने मान्य केला आहे, तसा (टेक्नोलॉजी वापरून) गर्भवती होण्याचा हक्क मान्य केला जाणार आहे की नाही?

http://doctorandpatient.blogspot.com/2010/08/why-are-young-fertile-women-doing-ivf.html


याचे उत्तर देणे फार कठीण आहे. मागे असाच एक मुद्दा पेपरात वाचला होता. त्याचेही उत्तर मी अजून शोधतो आहे. तंत्रज्ञान जस जसे प्रगत होत आहे तसे नैतिक - अनैतिकतेच्या कल्पनाही बदलतील, बदलाव्या लागतील बहुतेक!

प्रश्न असा आहे की, इंदिरा गांधी वा किरण बेदी न होताही सर्वसामान्य मुलगी म्हणून जन्माला येण्याचा आणि जगण्याचा मुलीला अधिकार आहे की नाही? कुणासाठीही उपयुक्त न ठरता केवळ जगण्याचा (मुक्या जनावराला) हक्क आहे की नाही?

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5928677.cms

१२ जून, २०१०

दमलेल्या बाबाची दुसरी बाजू

दमलेला बाबा सगळ्यांना मनसोक्त रडवतोय. युट्युबवर पाहा.
http://www.youtube.com/watch?v=4Q4XggDMETI

सहसा माझ्या डोळ्यात कधी पाणी येत नाही. पण हा व्हिडीओ पाहाताना आले.

डोळे पुसल्यावर थोडा मेंदू हलवला आणि दमलेल्या बाबाची दुसरी बाजू समोर आली. बाबाला २-३ वर्षांची छोटी मुलगी आहे म्हणजे वय तिशीच्या आसपास असणार. या वयात हार्ट ट्रबल, पाठदुखी, कंबरदुखी अशा छोट्या मोठ्या आजारांनी बाबा सतत का त्रस्त असतो? कॉलेजमध्ये असताना गंमत म्हणून लागलेली सिगरेटची सवय अजुनही चालूच? कधीतरी पार्टीत 'घ्यावीच लागते' म्हणून सुरू झालेली ड्रिंक्स आता कधी-मधी घरात कोणी नसताना चोरून पिताना बाबाला आठवते का आपली चिमुरडी? डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे व्यायाम होतो का कधी? तेरड्याचा रंग तीन दिवस? निदान योगातरी करायला हवा असे कधीतरी एकदा म्हटले की योगा 'होत' नाही. तो 'करावा' लागतो! थोडा पगार जास्त मिळतो म्हणून नोकरी बदलली, आता नवीन नोकरीत स्थिरस्थावर होण्यासाठी जास्त काम. बायको, मुलं कमी पैशात, कमी खर्चात राहायला तयार असताना लोन काढून ब्लॉक घेताना बाबाने नक्की काय हिशोब केला होता त्याचे त्याला माहीत. आई वडिलांशी पडत नसेल तर सरळ वेगळे होईन असा तोरा दाखवायचा तर घ्यावीच लागते जागा लांब, शहराबाहेर. मग लोकलचा प्रवास घाम गाळत करावा लागला तर त्याला बाबाच कारणीभूत आहे.

बाबा दमलाय हे खरे, पण त्याला जबाबदार कोण?

२५ मे, २०१०

असेही असते तर...

अनेक वेळा चावून चोथा झालेले विषय वारंवार चर्चेत आणून त्याचा आधार घेत सुतावरून स्वर्गात जाण्याचा प्रयत्न इंटर्नेटवर पडीक असलेली मंडळी करीत असतात. यातून काहीवेळा जातीय विखारही फुत्कारून घेतला जातो. उदाहरण द्यायचे तर या चर्चेचे देता येईल.

http://mr.upakram.org/node/2510

"वाल्मीकी रामायणातील स्त्रीजीवन" या विषयाशी फोटोसहित "सिक्स पॅक्स विश्वामित्र" आणि "एट(की टेन) पॅक्ड् भगवान परशुरामाचे पक्के युरोपियन वाटणारे कल्पनाचित्र" कसे काय संबंधित असू शकते? याचा अर्थ एकच आपला प्रतिसाद या विषयाशी संबंधित असो वा नसो आपल्या अन्ननलिकेत सतत घोळणारे गरळ कुठेतरी ओकून टाकले की माणसाला थोडे बरे वाटते. अर्थात इंटरनेटचा वापर अशा कारणांसाठीदेखील मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्याला काही हरकत असू नये.

माझाही खालील प्रतिसाद विषयाशी संबंधित नाही, तर एका प्रतिसादाशी संबंधित आहे - म्हणून मी ब्लॉगवर लिहित आहे.
_____

सहज शक्य असणार्‍या अनेक गोष्टी रामाने केलेल्या नाहीत ही गोष्ट लक्षात घेतली की रामाचे वेगळेपण जाणवायला हरकत नाही.
राज्यावर येण्यासाठी बापाचा, भावाचा काटा काढणार्‍या कथांनी जागतिक इतिहासाची पानेच्या पाने भरून गेलेली असताना सहज शक्य असताना राज्याभिषेकापासून दूर जाणारा राम मला तरी अपवादात्मकच वाटतो.

रावणाचे अंत्यसंस्कार करण्यास बिभिषणाने नकार दिला, तेंव्हा मेल्यावर वैर संपते असा विचार देणारा राम तेंव्हाच्याच नव्हे तर नंतर आलेल्या अनेक राजांपेक्षा वेगळा ठरतो.
मरणान्तानि वैराणि निवृतं नः प्रयोजनम् । कीयतामस्य संस्कारो ममापेष्य यथा तव ॥

लंकेतून परत येताना फक्त सीता आणि एअर लंकेचे एक फ्लाईट इतकेच रामाने आपल्याबरोबर आणले. त्यावेळचे त्याचे उद्गार निदान संस्कृत साहित्यात तरी अमर झाले आहेत.
अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥

राम-सीतेबरोबर इतकी वर्षे वनात राहूनही मी केयूरे, कुंडले ओळखत नाही पण सीतेची पैंजण मात्र ओळखतो असे म्हणणारा लक्ष्मण तर काही वेळा रामापेक्षा मोठा वाटतो.
नाहं जानामि केयुरे नाहं जानामि कुण्डले । नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात् ॥

केवळ रामाचेच नव्हे तर लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सर्व भावंडांचे व त्यांच्या अर्धांगिनींचे चारित्र्य सोळा आणे शुद्ध होते असे बहुतेक ऐतिहासिक संसाधने सांगतात. 'तसला' आरोप रामावर कोणी केल्याचे माझ्यातरी वाचनात नाही. प्रस्थापित विचारांना उडवून लावण्याच्या सध्याच्या फैशनचा हा भाग असे असे समजून या आरोपाकडे दुर्लक्ष करणेच चांगले असे माझे वैयक्तिक मत आहे.

११ मे, २०१०

मराठीचा ट्रॅप

दादर सार्वजनिक वाचनालय येथे संपन्न झालेल्या "मराठी ब्लॉगर्स" संमेलनामुळे मला झालेला फायदा म्हणजे इन्स्क्रिप्ट टंकलेखनाचे महत्त्व (नव्याने) समजले. लीना मेहेंदळे यांनी इंग्रजीतून विचार करण्यास भाग पाडणारे फोनेटिक तंत्र विसरा व इन्स्क्रिप्ट पद्धतीने टंकलेखन करा नाहीतर अजून काही वर्षांनी मराठी देवनागरीत का लिहावी? सरळ रोमनागरीतच का लिहू नये असा विचार पुढे येईल आणि तो मान्य झाला तर देवनागरी लिपीच (मराठीपुरती) नष्ट होईल असा इशारा दिला. हा विचार मला थोडा अतिरंजित वाटला. असे होण्याची शक्यता फार कमी आहे. ताईंनी "ट्रॅप" हा शब्द वापरला. मी माझी ओळख करून देताना तोच धागा पुढे नेऊन असे सांगितले की देवनागरी लिपी नष्ट करण्याचा खरा ट्रॅप अशुद्धलेखन व त्याचे निर्लज्ज समर्थन हे आहे. उदाहरण द्यायचे झाले तर "पितळी तांब्या" हा शब्द आपण जर "पितळि पीतळी पीतळि पितली पितलि पीतली पीतलि पित्ळी" अशा विविध प्रकारांनी लिहू लागलो तर अजून काही वर्षांनी रोमन मध्ये लिहिलेले "pitalee tambya" डोळ्यांना अधिक सुखावह वाटू लागेल. त्यात र्‍ह्स्व दीर्घ, जोडाक्षरांची "भानगड" नाही आणि जगात कोणालाही वाचता येईल, भाषा नाही समजली तरी!
विनोबांनी एके ठिकाणी म्हटले आहे की "विस्मरण हा दोष आहे असे कोणाला वाटतच नाही." त्याप्रमाणे अशुद्धलेखन हा एक दोष आहे असे हल्ली कोणाला वाटतच नाही की काय असा प्रश्न मला काही वेळा पडतो. "त्यांच्या"त असेच लिहितात ते मान्य करा नाहीतर मार खाल असे काही बाष्कळ समर्थन कोणी करेल असे वाटत नाही. कवितेत, लिखाणात पात्रांच्या तोंडी जी बोली भाषा यावी लागते ती तशी लिहिण्यास शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे सूट आहेच. आक्षेप आहे तो भाषा आणि लिपी गांभीर्याने न घेण्यावर. ताई आणि दादांनो, माझ्यामते हा ट्रॅप जास्त धोकादायक आहे!!

१६ जानेवारी, २०१०

निवान्त की निवांत?

निवान्त हा शब्द बरोबर आहे की निवांत?
आपल्या (निदान माझ्या तरी) डोळ्याला निवांत वाचण्याची सवय झाली आहे. भाषाशास्त्राच्या दृष्टीने कदाचित निवान्त देखील बरोबर असेल. पण गुगल सर्च दोन्ही साठी वेगवेगळे रिझल्ट दाखवत आहे. (निवांत २८५०० - निवान्त - ४०० ) याचा अर्थ संगणकशास्त्राला हे दोन शब्द एकच आहेत हे माहीत नसावे असे वाटते. त्यामुळे "हा शब्द असाही लिहिता येतो" या सवलतीचा मला आता त्रास होऊ लागला आहे. संगणकशास्त्राने या बाबतीत भाषाशास्त्रापेक्षा वेगळी नियमावली अंगिकारावी असे वाटते. तसेही संगणक सॉर्टिंग ऑर्डरच्या बाबतीत भाषाशास्त्राचे नियम पाळत नाहीच. तेंव्हा मग या बाबतीतही "एक शब्द एक पद्धत" या न्यायाचा अवलंब करावा. दोन्ही शास्त्रांत समन्वय झाला असता तर उत्तम होते पण तसे होईल असे वाटत नाही.