०३ जून, २०१३

बुद्धिवर ज्ञानाचा अंकुश!

मनोगतावर स्त्रियांच्या संशयी स्वभावावर एकाने (स्वानुभवावर आधारित?) लेख लिहिला आहे.

हिडिंबा आणि मेनका !

यात लेखकाच्या बायकोने भीम आणि विश्वामित्रचे उदाहरण देऊन लेखकाला कोणत्याही वयाच्या स्त्रीपासून लांब ठेवलेले दिसते. त्यांनी दिलेले दाखले अगदी बिनतोड आहेत आणि त्यांचा महाभारत व पुराणांचा अभ्यासही गाढा दिसतो. पण लेखकाने त्यांना उत्तर म्हणून लक्ष्मणाचे उदाहरण का दिले नाही? इतिहासात हिडिंबा आणि मेनका आहे तशीच सीताही आहे की!
विषयांतर होईल म्हणून तिथे प्रतिसाद न देता इथे माझे मत लिहितो. रामायणातील एक सुंदर प्रश्नोत्तर हे या संशय पिशाच्चावरचा उतारा आहे. लक्ष्मणाला विचारण्यात येते...
अग्निकुण्डसमा नारी घृतकुण्डसमः पुमान| पार्श्वे स्थिता सुन्दरी चेत् कस्य नोच्चलते मनः॥
अग्नि जवळ आला की तूप वितळते तशी अग्निकुंडासारखी सुंदरी समोर असताना कुणाचे मन विचलित होत नाही?

त्यावर दिलेले लक्ष्मणाचे उत्तर पाहा:
मनो धावति सर्वत्र मदोन्मत्तगजेन्द्रवत्‌| ज्ञानांकुशसमा बुद्धिस्तस्य नोच्चलते मनः॥
मन मदोन्मत्त हत्तीसारखे धावते पण ज्याच्या बुद्धिवर ज्ञानाचा अंकुश आहे त्याचे मन विचलित होत नाही.

तात्पर्य: सगळ्याच स्त्रिया "तशा" नसतात. सगळेच पुरूष "तसे" नसतात. स्त्री पुरुषांच्या नात्यात वैषयिक नात्यापलिकडे खूप काही असते जे दोन भिन्नलिंगांच्या सहजीवनाला उपयुक्त असते. काही वेळा स्त्रियांच्या नजरेने एखाद्या विषयाकडे पाहता येते त्यामुळे आधी न दिसलेले कंगोरे दिसू लागतात. "कायम संशय" हा वैवाहिकच नव्हे तर कोणत्याही नात्यात धोकादायक ठरू शकतो!