०९ नोव्हेंबर, २०१४

से नो टू जंक

आजच्या लोकसत्ता - लोकरंग पुरवणीतील वैद्य सुचित्रा कुलकर्णी यांचा आहारावरचा लेख फारच छान.

http://www.loksatta.com/lokrang-news/to-stop-acidity-1039776/?nopagi=1

त्यातील काही महत्त्वाची वाक्ये अशी:
आजची बाल आणि युवा पिढी यांचा आहार पोषक नाही हेच खरं आहे. चॉकलेट्स, वेफर्स, आइस्क्रीम, पाव, बेकरीचे म्हणजे मद्याचे पदार्थ, शीतपेये, पाणीपुरी-शेवपुरी असे चाट पदार्थ, बर्गर, विविध चवींचे सॉस, मिओनीज, न्यूडल्स या सगळ्या पदार्थामध्ये शरीराला वापरता येतील असे पोषक घटक नगण्य असतात. यातले काही पदार्थ तर नैसर्गिक नाहीतच, कृत्रिम आहेत. त्यामुळे त्यांचं काय करायचं हे शरीराला कळतच नाही. त्यातलाच काही भाग ते नाइलाजानं ठेवून घेतात, (रमीच्या डावात हवी ती पानं येत नसतील तर आपण नाही का आलेली निरुपयोगी पानं ठेवून घेतो..) साठवतात आणि वजन वाढू लागतं.

मुलांच्या लहानपणापासूनच पालकांनी जागरूक राहायला नको का? लाड म्हणून, आम्हाला मिळालं नाही म्हणून, सगळं खाण्याची सवय हवी म्हणून, जवळ पैसे आहेत म्हणून, मुलांना आवडतं म्हणून - अशी तद्दन भंकस कारणं पुढे करून या कचऱ्याची/ विषाची चटक मुलांना कोण लावतं? आई-बाप झाल्यावरही आपल्याला जर आहाराबाबत योग्य-अयोग्य ठरवता येत नसेल, तर बिचाऱ्या मुलांना इतक्या लहान वयात सांगितल्याबरोबर ते कळेल आणि वळेल अशी अपेक्षा आपण कशी काय करू शकतो? मग यावर उपाय काय? तर या पदार्थांना उत्तम पर्याय असे घरगुती, ताजे, पोषक आणि चविष्ट पदार्थ सगळ्या मातांनी ते बनवले पाहिजेत.

सायलीसारख्या मुलींच्या अग्नीची वाट लावणारा मुख्य घटक म्हणजे व्यायामाचा अभाव. 'मार्कांच्या स्पर्धेत उतरवलेल्या आपल्या पाल्यानं अभ्यासाशिवाय इतर कुठलेही 'फालतू' उद्योग (व्यायाम, घरकाम, स्वतःची कामं, खेळ, चालत शाळेत जाणं) केलेले आजच्या महत्त्वाकांक्षी पालकांना अजिबात खपत नाही.

औषधं, पंचकर्म याद्वारे इलाज करता येतात. पण ते खूप वेळखाऊ असतात आणि रुग्ण ते गांभीर्यानं घेत नाहीत. लहानपणापासून योग्य आहार ठेवला तर कित्येक आजारांपासून आपल्या मुलांना दूर ठेवता येऊ शकतं. आरोग्याच्या बाबतीत नेहमीच 'तहान लागण्यापूर्वी विहीर खणणे' इष्ट. 
_____

खरोखर डोळ्यात अंजन घालणारा लेख आहे हा.
मुळातूनच सगळा वाचायला हवा असा.

जंक फुड खाण्यापूर्वी मी माझीच अशी समजूत करून घेत असे की "कधीतरी खायला काय हरकत आहे? आपण काय रोज थोडीच खातो ह्या गोष्टी?" पण आता हिशोब करतो तेव्हा लक्षात येते की जंक फुडचे हजारो प्रकार. एकच ईश्वर पण त्याची खूप नावे, तसा काहीसा हा प्रकार. वर्षातून एक, दोनदाच खायचे म्हटले तरी कित्येक वर्ष पुरतील इतक्या व्हरायटीने सगळे मॉल ओथंबून वाहताहेत. यातून बाहेर पडायचा एकच उपाय, "से नो टू जंक फूड" गाई म्हशींसकट सगळं प्राणी जगत आपलं अन्न ओळखतं आणि बाकीच्या गोष्टींना तोंड लावत नाही. आपण मात्र पुढे येईल ते पोटात ढकलतो! आहार हाताबाहेर जाण्यास आपले संस्कारही कारणीभूत आहेत. यातील मुख्य नऊ:

१) पानात काहीही टाकायचं नाही.
२) सगळं पचलं पाहिजे, नसेल पचत तर सवय करायची.
३) रोज नाही, पण कधीतरी खायला काय हरकत आहे?
४) शिपीभर अन्न पातेल्यात उरता कामा नये. केलेलं सगळं संपलं पाहिजे.
५) तो बघ. तुझ्या एवढाच आहे. पण त्याचे खाण्यापिण्याचे काही नखरे नाहीत. एकदम आदर्श मुलगा !
६) आपल्यात (आपल्या जातीत) हे खात नाहीत किंवा हा पदार्थ असाच करतात.
७) असली थेरं इथे चालणार नाहीत. खाण्यापिण्यावर असा खर्च केला असता तर आमचा संसार झाला असता का?
८) पालेभाजी धुवा, निवडा, चिरा म्हणजे खूप व्याप. पालेभाजीला श्रम आणि वेळ जास्त लागतो. त्यापेक्षा वांगं, बटाटा, भेंडी अशा फळभाज्या बर्‍या पडतात करायला. त्यालाही वेळ नसेल तर नाक्यावर मिळतात हल्ली सगळ्या भाज्या, रेडिमेड. ४० रुपये प्लेट म्हणजे थोड्या महाग पडतात, पण वेळ (त्यापेक्षा श्रम) वाचतात. ते महत्त्वाचे.
९) आज मिळतंय ते खाऊन घे. उद्या कदाचित हे देखील मिळणार नाही.

काही दुकानांमध्ये "कृपया इन शब्दोंका प्रयोग मत किजीये" अशी विनंती करणारा एक फलक असतो. त्यात "पहचानता नहीं क्या? , पैसा कल देता हूं, लिख लेना" अशी वाक्ये असतात. तसा घरात एक बोर्ड बनवायला हवा. वर दिलेली ९ वाक्ये उच्चारू नयेत असा!

१० जुलै, २०१४

नवीन प्रकारचा गरम मसाला

पंच फोरन हे पाच मसाल्यांचे मिश्रण पूर्व भारतात विशेषतः बंगालमध्ये वापरले जाते. यात बडीशेप, मेथी, जीरे, मोहरी आणि कलोंजी या बिया समप्रमाणात भाजून त्याची पूड करतात. हा मसाला, गरम मसाल्यासारखाच कुठेही वापरता येतो. यात मेथीचे दाणे थोडे कमी घातले तरी चालतात. (इतर मसाल्यांच्या मानाने निम्मे). हा मसाला स्वादीष्ट तर आहेच पण आरोग्यासही हितकारक ठरतो. कलोंजीच्या बिया महाराष्ट्रात फारशा वापरात नाहीत. पण आता त्या सगळीकडे मिळतात. हायपरसिटी किंवा डी-मार्ट मध्ये तर हमखास. तर मग ट्राय करुया पंच फोरन.

०३ जुलै, २०१४

भविष्यातील नवी आव्हाने

जीवघेणी स्पर्धा, वैचारिक कट्टरता आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता या तीन गोष्टींशी नवीन पिढीला सामना करावा लागणार आहे. खूप स्पर्धा निर्माण झाली की तिला गळेकापू (cut throat) म्हणतात. "गळेकापू" या शब्दातच हिंसा आहे. अशी स्पर्धा केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही असे प्रत्येकाच्या मनावर बिंबवले जात आहे आणि त्यामुळे ज्याला त्याला जिथे तिथे घुसण्याची घाई झाली आहे. विरोध सहन न होण्याची असहिष्णुता ही आहे आजची नवीन फॅशन. धर्म, जात, भाषा या सर्व बाबतीत कडवेपणाचा स्विकार केला तर काय होईल? आपल्या अनुभवाचा परीघ लहान होत जाईल. आपण आपल्याच नकळत संकुचित विचारांचे बनू आणि आपलेच नुकसान होईल. इंग्रजीला विरोध केला तर तंत्रन्यानात मागे पडू. "लुंगी हटाव" अशी घोषणा देत दाक्षिणात्यांना विरोध केला तर तिकडच्या सुंदर मंदिरांचा आणि भोजनाचा आस्वाद घेताना आपण काहीतरी चुकीचे करत आहोत असे आपल्याला वाटेल. हिंदू धर्मात अनेक जाती/ पंथ आहेत. प्रत्येकातून काहीतरी शिकण्यासारखे आहे. प्रजापिता ब्रम्हाकुमारीचा पंथ असेल तर त्यातून स्वच्चता आणि अन्नाची शुद्धता शिकता येईल. रामदेव बाबाकडून योग शिकूया तर पंढरीच्या वारकर्‍यांकडून समानता आणि निर्व्यसनी रहायला शिकेन अशी द्रूष्टी हवी. आता त्या पंथातही काही चुकीच्या गोष्टी होत असतीलच, पण आपली नजर फक्त जे उज्जव आणि भव्य असेल त्याकडे हवी. काय स्वीकारायचे ते शिकायला हवे. ड्न्य्हानेष्वरीत फार सुंदर उपमा आहे. गाईच्या आचळाला चिकटलेले गोचीड काय पिते? तर रक्त. दुधाच्या इतके जवळ राहून दूध न पिता रक्त पिण्याची बुद्धी गोचीडाला का व्हावी? आपल्याही आजूबाजूला मंगल, उदात्त, भव्य आणि आशादायक गोष्टी आहेत त्या न पाहता फक्त कचराच का पाहायचा?

आज अशी परिस्थिती आहे की भविष्यात सगळं चांगलंच होईल असं ग्रूहीत धरून चालता येणार नाही. कदाचित काही जुनी माणसं म्हणतात तसं "गेले ते दिवस बरे होते" असे म्हणण्याची देखील वेळ येऊ शकते. पण कशाही परिस्थितीला तोंड देता आले पाहिजे. सुखाच्या आणि दु:खाच्या लाटांमधून पोहून कसं पार व्हायचं याचं शिक्षण आपल्याला मिळालं पाहिजे. ते घरी, शाळेत, क्लासमध्ये आणि जगाच्या शाळेत असं शिक्षण मिळतं. ते शिकता मात्र आलं पाहिजे. आपल्याला ते शिकता येत नाही याचं महत्त्वाचं कारण आपल्याला त्या न्यानाबद्दल व ते शिकवणार्‍या गुरुंबद्दल आदर नसतो. गीतेमध्ये कृष्णाने सांगितले आहे की "इदं तु ते नातपस्काय, नाभक्ताय कदाचन". भक्ति आणि तपस्वी नसेल त्याला हे सांगू नको. का? कारण अशी लोकं आपल्यालाच शिकवतील आणि आपला मुद्दा कसा चूक याचा कीस काढत बसतील. म्हणतात ना, "तुटे वाद, संवाद तो हीतकारी". वाद नको, संवाद हवा, ज्यात दोघांनाही काहीतरी लाभ होईल. संवाद वाढवायचा तर मन आकाशासारखं खुलं ठेवायला हवं. कुजक्या डोक्यानं जे होतं त्याला भांडण, वितंडवाद म्हणतात आणि त्याचं पर्यवसन द्वेष आणि मत्सरात होतं. मला असं सांगितलं गेलं आहे की हल्ली शाळेत शिक्षक वर्गावर येतात आणि विद्यार्थांकडे न बघता शिकवतात मग निघून जातात. जर संवाद साधला नाही तर ते एकतर्फी शिक्षण होईल. त्यातून कदाचित मुले पास होतील पण ती विकसित, जबाबदार आणि लोकप्रिय नागरिक बनणार नाहीत.
भविष्यातील नवी आव्हाने स्विकारण्याची शक्ति आणि बुद्धी आपल्या सर्वांना मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.