१२ एप्रिल, २०११

वर्ल्ड कपच्या निमित्ताने...

ही चर्चा उद्बोधक आहे, आणि माझा प्रतिसाद त्यातील एका प्रतिसादाला उद्देशून आहे. तो विषयाशी संबंधित नाही. पुष्कळशा पसरटपणे माझे म्हणणे मांडायचे होते म्हणून उपक्रमावर न लिहीता ब्लॉगवर लिहीत आहे.

http://mr.upakram.org/node/3231#comment-55603

रोझा पार्कने जेव्हा स्वतः उठून बसमधील आपली जागा गोर्‍याला देण्यास नकार दिला तेंव्हा बहुतांशी लोकांनी "आहे हे असे आहे, इथे रहायचे असेल तर रहा. नाहीतर आम्ही काही निमंत्रण दिलेले नाही अमेरिकेचे" अशा अर्थाची काहीतरी बडबड केलीच.

http://en.wikipedia.org/wiki/Rosa_Parks

बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला तेंव्हाही लोकांनी विविध दाखले, परंपरा याचा उहापोह केला होता. पण शेवटी सत्य, समानता आणि विकास या त्रयीकडे जायचे की परंपरा आणि आगम प्रमाणाचा अतिरेक करायचा हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते.

बर्‍याचदा एखादी गोष्ट इतकी आंगवळणी पडलेली असते की तिचे अस्तित्वच जाणवत नाही. अन्याय, अतिरेक हा देखील असाच सवयीचा होऊ शकतो. आपल्या अंगाला येणार्‍या घामट वासाची जाणीव जशी घरच्यांनी किंवा जवळच्या व्यक्तिंनी सांगितल्याशिवाय लक्षात येत नाही, सवयीचा भाग झाल्यामुळे. तशा खूप गोष्टी आपल्याला आपोआप दिसेनाशा होतात.

सावित्रीबाईंनी स्त्रियांना शिकवायला सुरूवात केली तेव्हा समाजाची प्रतिक्रिया काय होती? सती जाणे, विधवांचे केशवपन हे सर्व स्टँडर्ड समजून पाळले जात होते. ज्यांना ते मान्य नसेल अशांना हिमालयात निघून जायचा सल्ला दिला जायचा. (आणि काहींनी तो पाळलाही!)

ज्या पू. ल. देशपांड्यांचे उदाहरण आपण दिले आहे, त्यांनी देखील आणिबाणीला विरोध केला होता. कॉग्रेसला पाडण्यासाठी ठिकठिकाणी प्रचार केला होता. "विदूषक" अशी हेटाळणी त्यांच्या वाट्याला आली आणि निवडणुकीनंतर सत्ता हे आपले ध्येय नाही असे जाहीर करत "परत विदूषकाच्या भुमिके"त असा लेख लिहीता झाले.

अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरचा घाला पुलंना सहन झाला नाही, ते आपल्या परीने लढले. चंद्रशेखर यांना ध्वनिप्रदुषणाचा प्रश्न महत्त्वाचा वाटला, त्यांनी तो संयमित शब्दात मांडला. कुणाच्याही भावना न दुखावता आपली तक्रार समाजापुढे ठेवली, कारण कदाचित बहुमताविरुद्ध खूप मोठा संघर्ष करणे (कोर्टात/ पोलिसात जाणे वगैरे) त्यांना शक्य नसेल किंवा अन्य काही कारण असेल.

गोठ्यात राहून बैलाच्या मुताची घाण येते अशी तक्रार करणारी माणसे मला फार महत्त्वाची वाटतात. कारण त्याचा अर्थ त्यांना अजुन त्याची सवय झालेली नाही. सुवास आणि दुर्गंध यातील फरक ओळखण्याइतपत त्यांची घ्राणेंद्रिये काम करत आहेत आणि "घाण येतेय" अशी तक्रार करण्याइतपत तरी धैर्य त्यांच्यात शिल्लक आहे.

माणसाचं कंडिशनींग एकदा झालं की तो पोपटासारखा ऐकलेले बोलू लागतो. वाचलेले घडाघडा म्हणून दाखवतो, त्यातून फार तर त्याची बुद्धीमत्ता दिसते. त्याचा अर्थ तो बरोबर बोलत आहे असा होत नाही. आगम प्रमाणाचा अतिरेक हा प्रत्यक्ष प्रमाणाच्या अतिरेकापेक्षा जास्त घातक आहे. व्यभिचारी स्त्रीला दगडाने ठेचून मारणे यात मुस्लीम देशांना काही वावगं वाटत नाही. हे आगम प्रमाणाच्या अतिरेकाचे एक उदाहरण आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Stoning

जगातील कोणत्याही देशात अशी शिक्षा (कायद्याने) दिली जात नाही. पण "शरियत कायदा" या एका शब्दाने सर्व समीकरणे बदलून जातात आणि अचानक त्यातील क्रौर्य, निर्दयता दिसेनाशी होते.

ज्ञानेश्वरांनी दाखविलेला विवेकाचा मार्ग आणि पातंजलिने ठेवलेला संयमाचा आदर्श यापासून न ढळण्यातच खरी "समजदारी" है!